रत्नागिरी : मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रत्नागिरी येथील गोळपमध्ये चालविण्यात येणाऱ्या मुकुल माधव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुबक व आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या याच मूर्तीची प्रतिष्ठापना शाळेच्या गणेशोत्सवात करण्यात आली.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया यांच्या संकल्पनेतून व शाळेचे मुख्याध्यापक सचिन कोल्हे यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून रत्नागिरी येथील मूर्तिकार मयूरेश भारती यांना शाळेत निमंत्रित केले होते. त्यांनी इयत्ता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविले.
गणेशमूर्ती स्पर्धेचे परीक्षण मयूरेश भारती, कला शिक्षक हृषीकेश शेलार, नवीन बिजलानी, रोहित देशपांडे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या निवासानुसार संघ करण्यात आले होते. यामध्ये ऑरेंज हाउसने प्रथम, व्हाइट हाउसने द्वितीय, तर ग्रीन हाउसने तृतीय क्रमांक पटकावला. रितू छाब्रिया यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या अधीक्षक राधा करमरकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. अश्विनी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक दीपिका पडवळ यांनी आभार मानले.
उपक्रमाविषयी बोलताना रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘प्रदूषणमुक्त गणेशोत्सव हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजावा व समाजात एक सकारात्मक संदेश जावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला होता. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता व प्रेम निर्माण व्हावे म्हणून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.’